Wednesday, 9 August 2017

समज 



समजलंय…, असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मला समजत असतं की हा सगळा असमंजसपणा आहे
थोड्या काळाने समजांच्या रेषा धूसर होऊन समजलेलं सगळं समजांच्या पुढे निघून जाईल कुठंतरी

सगळ्या समजा वर्तमानातल्या. त्यांना भविष्य नाही ना भूतकाळ, असा माझा एक समज आहे
कारण अंतीम सत्य हे नेहमी कालातीत असतं, पण ते समजत असलं तरी उमजत नाहीच

समजा आणि हे सगळे समज उमजलेच तर बोलायला काही उरेल का?
कारण हे सुद्धा समजेल कि प्रत्येकाला स्वतःच शोधाव्या लागतात स्वतःच्या समजुती

मग सगळी प्रवचनं, सल्ले, सिद्धांत, वादविवाद, उपदेश सगळी बाष्कळ चर्चा होऊन उरेल
बंद होतील अनेक व्यवसाय, अनेक प्रार्थना स्थळं, का सगळे संवादच (आणि मग वाद) संपून जातील?

लोक करतील प्रयोग स्वतःचे. कुणी शांत होईल, कुणी खून करेल, कुणी बलात्कार
आणि ज्यांच्यावर हे प्रयोग होत राहतील त्यांच्या समजांचं काय ?

ह्याचा अर्थ असा का की प्रत्येकाने वाटले पाहिजेत आपले समज?
ह्या आशेने कि समजा समजलेच कुणाला तर त्यांचे कष्ट, विवंचना कमी होतील
लिहून काढावी का गीता किंवा तुकाराम गाथा किंवा कुणा एकाची भ्रमणगाथा?
का कुठल्या निर्मनुष्य जंगलात जाऊन ध्यानस्थ बसावं?

मला सगळं समजतंय असा गैरसमज नाहीये माझा, 
पण विचार करूच नये असं समजावलं मनाला तरी त्याला समजत नाही त्याचं काय?
आणि समजा ऐकलंच मनानं, तर हे समज विरून जातील? 
का असतील कुठंतरी? कुठंतरी म्हणजे नक्की कुठं?

सगळं समजण्याच्या पुढं जायला लागलंकि मी डोळ्यावरचा चश्मा काढतो, चोळतो डोळे.
वहीतलं सगळं धुसर दिसायला लागतं
वही बंद करून टाकतो, म्हणतो स्वतःलाच, वाचूया नंतर कधीतरी, तेव्हाच्या समजांचा चश्मा घालून


प्रमोद (२२ डिसेंबर २०१४)

No comments:

Post a Comment