स्वैर संयत ?
माझ्या कविता विचारांच्या आणि बांधणीच्या दृष्टीने अतिशय स्वैर असतात, त्याला एका धाग्यात कसं गुंफायचं हा फार मोठ्ठा प्रश्न आहे.
त्याच बरोबर माझं आयुष्य काही चांगुलपणाच्या साच्यात बांधलं गेलं आहे. संस्कार म्हणा, आजूबाजूचं वातावरण म्हणा, भेटलेल्या माणसां-मित्रां मुळं म्हणा किंवा एका साळसूदपणाच्या भित्रेपणामुळं म्हणा, पण विचारात कुठेही हिंसेचा उद्रेक नाही, चेतवेल असा शृंगार नाही आणि जहाल वाटेल असा निर्णायक हेका सुद्धा नाही, …. म्हणून संयत.
माझ्या स्वैरपणाचं मला कौतुक नाही ना संयतपणाचं, त्याच बरोबर मी त्याच्यामुळं खजीलही नाही…. स्वतःच्याच हाताकडं बघितल्यावर कुठल्या परक्याच विचित्र गोष्टीकडं पाहत असल्याचा भास होतो ना कधीकधी तसा काहीसा भास होतो मला स्वतःच्या कवितांकडं बघतांना. त्या कधी मला प्रचंड आवडून जातात आणि कधी खूप पाणी घातलेल्या चहा सारख्या सप्पक बेचव वाटतात…
No comments:
Post a Comment