Wednesday, 9 August 2017

गटार



म्हणून, म्हणून म्हणत असतो मी की ही असली कामं भरपूर वेळ असतांना काढावीत
सुट्टीच्या दिवशी जास्त वर्दळ नसेल तेव्हा, म्हणजे सगळी उघडलेली झाकणं बंद करता येतात

राहिलं ना उघडं झाकण, अगदी रहदारीच्या रस्त्यावर?
आणि लक्ष सुद्धा नसतं अश्या वेळी
हि अत्माविवंचनेची कामं अशी नाही होत. जगापासून दूर कुठंतरी एकांतवास हवा,
नाहीतर सुरु होते रहदारी नकळत



'हे योग्य आहे का?' अशा काहीश्या प्रश्नावर विचार करत रस्त्यावरून चालत असतांना
अचानक, काही समजायच्या आत मी पडलो स्वतःत, खोल अंधार भरलेला सगळीकडं
पडल्यावर लगेच कळलं गलिच्छ वासाने भरलेलं पाणी आहे खाली
चिखल आहे, घुशी आहेत. कुठून कुठून वाहून आलेल्या कुठल्या कुठल्या गोष्टी
माझं मलाच सहन होईना. इतकं काही शिसारी आणणारं भरलंय माझ्यात?
….
….

अरे हि झाकणं ठेवायचीच कशाला? बुजवून टाकली तर काय फरक पडतो?
तुंबतं आत सगळं? रस्ताच फोडावा लागतो? हं SS
आणि घुशी फारच झाल्या तर सगळा अंतर्भाग पोखरून टाकतात?
हं S S अरे मग झाकणं तरी आठवणीनं लावावीत. चला बंद करून टाका पटकन

….

आत अंधार आणि वर यायला जीना नाही. किती वेळ तिथंच पडून राहिलो कोणास ठाऊक
हे सगळं साफ करायला हवं असं जाणवत होतं, मनातल्या मनात एक आराखडा बनवून टाकला
….
….

अरे झाकण लावताय काय? आत कुणी पडलं नाहीयेना ते बघा एकदा.
काय? आहे? काढा बाहेर. हं टाका दोर, पकड म्हणावं घट्ट
…..
…..

'काय ठीक आहात ना? अहो तुमच्याशी बोलतोय? अहो?'
हं, कुठला तरी मोठ्ठा धक्का बसलेला दिसतोय, जाऊ द्या होईल ठीक.
चला लाऊन घ्या झाकण पटकन. आणि हो लक्षात ठेवा… …
हि अत्माविवंचनेची कामं अशी नाही होत. जगापासून दूर कुठंतरी एकांतवास हवा,
नाहीतर सुरु होते रहदारी नकळत
 
प्रमोद (२० जानेवारी २०१५)

No comments:

Post a Comment