च्यायला उगाच खरं बोलायला गेलो, सांगायला हवं होतं वाढवून चढवून काहीतरी
पण मी गांधीजींचा भक्त, सांगून टाकलं, मला नाही माहीत कुठून येतात कविता ते
कधी पहाटेच्या वाऱ्यासारख्या येतात तर कधी युद्धातल्या बॉम्बसारख्या कोसळतात डोक्यात
पण एवढं नक्की रोज येणार्या पेपर किंवा दुधवाल्यासारख्या भरवशाच्या नाहीत, अगदी कामवाली इतक्याही नाहीत
त्या नंतर तीचं रोजचं भेटणं कमी होत गेलं,
एकदा भेटली अचानक खिशात पेन नसताना भेटलेल्या कवितेसारखी.
थांबवता सुद्धा आलं नाही आणि जाऊही देता नाही आलं, जितका पकडायचा प्रयत्न तितकीच अलगद गेली निघून
म्हणाली पैशाचा स्त्रोत ज्यावर अवलंबून आहे त्या कवितेचा स्त्रोत जर ठाऊक नसेल तर कशाच्या भरवशावर राहू मी
मी काही बोललो नाही नुसताच शांत राहिलो, कविता सुचत असल्यासारखा,
ती निघून गेली थोड्यावेळ वाट पाहून
आता नाही भेटत आम्ही, माझ्या फेसबुकवर टाकलेल्या कवितांना ‘लाईक’ करते ती
करणार आहे मी तिला ‘अन्फ्रेंड’, वाट बघतोय फक्त . .शंभराव्व्या कवितेला ‘लाईक’ करायची .
‘साल्या नव्व्याणऊ कविता सुचतात आणि शंभराव्वीच कशी सुचत नाही, उगाच भावनिक होऊ नकोस.
मित्र रागावून म्हणाला.
मी म्हणालो, ‘खरंच मला नाही माहीत कुठून सुचतात मला कविता ते!’
प्रमोद (भिकनगाव, जुलै १५, २०१४)
प्रमोद (भिकनगाव, जुलै १५, २०१४)
No comments:
Post a Comment