कधी बसला आहेस का निश्चल, भावनांनी ओथंबलेला तरी कोरडा? शून्यात बघत.
दगडाला सुद्धा लाजवेल असा थिजलेला, तासनतास
रडला आहेस का कधी कुठल्याश्या बेवारशी अनामी दुःखासाठी. अविरत बरसणाऱ्या पावसासारखा
पुनःपुन्हा येणाऱ्या हुंदक्यांना गोंजारत, तान्ह्या बाळासारखं
चिडला आहेस का स्वतःवर, देवावर चिडल्यासारखा
आरश्यासमोर उभारून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःच्याच निर्लज्जपणाचे पाढे वाचत?
कधी पुरलं आहेस का स्वतःला उबदार पृथ्वीत खोल. स्वतःवर माती लोटून देत.
भयावह काळोख्या अंधारात आत्मज्योत तेववून
कधी पोहोचला आहेस का स्वतःचाच माग काढत आईच्या उदरात?
पोटातल्या पाण्यात तरंगत अनुभवलं आहे का जळणाऱ्या प्रेतातून निसटलेल्या आत्म्याचं हलकंपण
कधी झोकून दिलं आहेस का, महाकाय उंच कड्याच्या टोकावरून स्वतःला
कानात फडफडणाऱ्या वाऱ्यासोबत डोळ्यात भरून घेतलेला अंधार.......
शेवटच्या आघाताची वाट पाहात केलेला शेवटचा प्रवास
आणि.........................................................................
...................................................................................... धाड
प्रमोद ( १२ मे २०१७ )
No comments:
Post a Comment