माझ्या कविता विचारांच्या आणि बांधणीच्या दृष्टीने अतिशय स्वैर असतात, त्याला एका धाग्यात कसं गुंफायचं हा फार मोठ्ठा प्रश्न आहे. त्याच बरोबर माझं आयुष्य काही चांगुलपणाच्या साच्यात बांधलं गेलं आहे. संस्कार म्हणा, आजूबाजूचं वातावरण म्हणा, भेटलेल्या माणसां-मित्रां मुळं म्हणा किंवा एका साळसूदपणाच्या भित्रेपणामुळं म्हणा, पण विचारात कुठेही हिंसेचा उद्रेक नाही, चेतवेल असा शृंगार नाही आणि जहाल वाटेल असा निर्णायक हेका सुद्धा नाही, …. म्हणून संयत.
Wednesday, 26 June 2024
आयुष्य आणि अंत
दुधाची पिशवी रिकामी करावी
तसं स्वतःला स्वतःतून बाहेर
ओतता यायला हवं
आतलं जिन्नस
हवं तसं गरम गार
हवं तेव्हा वापरून
संपवून टाकायला हवं
भरलेली पिशवी
हवी हवीशी वाटत असली तरी
वापर होणं महत्वाचं
बाहेरची पिशवी
स्वच्छ धुवून
पुनर्चक्रण करायला सोपवावी
कोण्या एकाला
किंवा पुरून टाकावी
अनादी अनंत काळाचा
महिमा स्मरून
कुणाच्या पोटात जाऊन
कुणाच्या मृत्यूचं कारण
होऊ न देता
हळू हळू विघटत जावं
चार चौघांसारखं
सामान्य
प्रमोद
२६ जून २०२४
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment