माझ्या कविता विचारांच्या आणि बांधणीच्या दृष्टीने अतिशय स्वैर असतात, त्याला एका धाग्यात कसं गुंफायचं हा फार मोठ्ठा प्रश्न आहे. त्याच बरोबर माझं आयुष्य काही चांगुलपणाच्या साच्यात बांधलं गेलं आहे. संस्कार म्हणा, आजूबाजूचं वातावरण म्हणा, भेटलेल्या माणसां-मित्रां मुळं म्हणा किंवा एका साळसूदपणाच्या भित्रेपणामुळं म्हणा, पण विचारात कुठेही हिंसेचा उद्रेक नाही, चेतवेल असा शृंगार नाही आणि जहाल वाटेल असा निर्णायक हेका सुद्धा नाही, …. म्हणून संयत.
Saturday, 12 March 2022
पुन्हा रिक्षावाला
रिक्षात बसल्यावर,
रिक्षावाला पुनःपुन्हा विचारत राहिला
'कुठं? कुठं जायचंय?'
मी पुनःपुन्हा सांगत राहिलो
'कुठंच नाही, तू चल'
'मुक्काम ठाऊक असल्याशिवाय
निघू कसा मी?'
रिक्षावाला वैतागून म्हणाला
'निघण्यासाठी मुक्काम नाही
सशक्त पाय लागतात.
एक सुरा, बंधनं कापून टाकायला.
सुहृदता लागते रस्त्याशी नातं जोडायला.
चल तू, जो रस्ता तुझ्याशी बोलेल तिकडं'
असेच फिरत राहिलो
रस्त्याचं होकायंत्र वापरून.
अचानक ओरडलो, 'थांब'
व्यवहार पूर्ण करून निघालो.
रिक्षावाला म्हणाला,
'इथंच जायचं होतं तुम्हाला?'
'नाही, पण इथं 'पोहोचलो मात्र आहे'
प्रमोद
१२ मार्च २०२२
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment